किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक बदल होत असतात. तसेच ही मुले भावनिकदृष्ट्या संवेदनशील होत असतात. अशा वयात मुलांना समजून घेण्याची गरज असते. ही जबाबदारी घरी पालक आणि शाळेत शिक्षकांची असते. १४-१५ वर्षांच्या वयोगटातील मुलांच्या मनातील विचारांचे, भावनांचे वादळ, प्रश्न, स्वअस्तित्वाची जाणीव, मोठ्यांशी होणारा संघर्ष आणि मग मुलांचा स्वतःशीच होणारा संवाद डॉ. स्वाती गानू-टोकेकर यांनी ‘मुलांच्या मनात डोकावताना’ या पुस्तकामधून आदित्य या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाच्या डायरीतून मांडला आहे. शिकणे-शिकवणे आणि मुलाला मोठे करण्याच्या आनंदयात्रेत मुलांना बरोबर घेताना पालकांनी त्यांच्या मनात डोकावून पाहायला हवे, असा विचार लेखिकेने व्यक्त केला आहे. त्यातून मुलाला समजून घेता येते. त्यांच्यातील निरीक्षणशक्ती, उत्सुकता, सर्जनशीलता जाणून माणूसपण जपता येते. नात्याला समृद्धपण लाभते. नेहमी मोठ्यांच्या भूमिकेतून मुलांच्या आयुष्याचे निर्णय घेणाऱ्या पालकांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला यातून मिळतो. तसेच आदित्यप्रमाणे आपणही स्वतःतील चांगल्याचा शोध घेऊन प्रगती करू शकतो, हे मुलांना या स्वसंवादातून समजते.
पुस्तक : मुलांच्या मनात डोकावताना
लेखिका : डॉ. स्वाती गानू-टोकेकर
प्रकाशन : वैशाली प्रकाशन
पृष्ठे : १५५
मूल्य : १६० रुपये
(‘मुलांच्या मनात डोकावताना’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)